कविता: अमिषाला बळी पडू नको रे !


 


कविता: अमिषाला बळी पडू नको रे ! 


सावध रहा गड्या सावध रहा, अमिषाला बळी पडू नको रे l

 अस्तित्व तुझे पुसण्या निघाले, त्यांची संगत करू नको रे ! ll धृ ll


पूर्वजांची ही मालमत्ता, उदारतेने तू देशील सोडून l

बदल्यात तुला किती काय मिळाले, स्वमनाशी हे घे जाणून ll 

अधिकाऱ्यांच्या गप्पा नेत्यांच्या थापा, त्यांशी भुलून जाऊ नको रे ! ll १ll 

 अस्तित्व तुझे पुसण्या निघाले, त्यांची संगत करू नको रे ! l 


कष्टकरी तू शेतकरी तू, जगाचा तू असशी पोशिंदा l 

तरी छातीवरी ठेवती पाय तुलाच करती रे शरमिंदा ll 

सत्य आवाज दाबणाऱ्या असुरांशी संगत करू नको रे! ll२ll

 अस्तित्व तुझे पुसण्या निघाले, त्यांची संगत करू नको रे! l


झाल्या यातना सहन होईना, बळीराजा मागतो न्याय l

विश्वासू यंत्रणा विकाऊ झाल्या,नाही उरला काही पर्याय ll 

एकजुटीच्या या वज्रमुठीने दृष्ट प्रवृत्तीला हाणून पाडू रे ! ll३ ll 

अस्तित्व तुझे पुसण्या निघाले, त्यांची संगत करू नको रे ! l 


हे गोविंदा,मूर राक्षसाचा वध करणारा तूच रे मुरारी l 

द्रौपदीची लाज राखणारा शाम तूच आहेस श्रीहरी ll 

म्हणे सागोसुत श्रीहरीस आता फक्त विश्वास तुझ्यावरी रे ! ll ४ ll

अस्तित्व तुझे पुसण्या निघाले, त्यांची संगत करू नको रे! l

**********

 कवी: श्री.संतोष सावित्रीबाई गोपाळ सावंत उर्फ (सागोसूत हरिसंतोष) मो . 9324389918

 दिनांक : २ जुलै २०२५

 वेळ : सकाळी ८.३० ते ९.३० वाजता दरम्यान रचलेली ही काव्य रचना 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या