नवी मुंबई : नेरुळ येथील यूथकौन्सिल या सेवाभावी संस्थेच्या विद्यमाने मंगळवार दिनांक १५ जुलै २५ रोजी पनवेल तालुक्यातील चिंचवली येथील वनवासी कल्याण आश्रमातील मुलांसाठी शालेय साहित्य, साबण, टूथपेस्ट, खोबरेल तेल, हात रुमाल अशा दैनंदिन लागणाऱ्या गरजेच्या वस्तू यांची पूर्तता याबरोबरच दोन सिलिंग पंखे अशा स्वरुपाची भरीव मदत उपलब्ध करुन देण्यात आली. डॉ . रवींद्र गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या उपक्रमात आश्रमाच्या छात्रावास पालक सौ. प्रिया आचवल, विवेक फोफावणे, सुभाष हांडे देशमुख, जी. आर. पाटील, अशोकराव महाजन, दत्तात्रय आंब्रे, दिलीपराव चिंचोळे, रवींद्र कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गतच सिद्धिविनायक केअर सेंटर तुर्भे स्टोअर यांच्यातर्फे आश्रमातील सर्व मुलांची शारीरिक तपासणी, उपचार, चिकित्सा व आवश्यक त्यांना औषधे देण्यात आली.
डॉ. रवींद्र गोसावी यांनी यावेळी यूथकौन्सिल संस्थेच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करुन विद्यार्थ्यांना शरीर स्वास्थ्या विषयी सखोल मार्गदर्शन केले. आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे विशद करताना, त्यांनी सांगितले की आपला सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे आपले शरीर व आपले आरोग्य हेच आहेत. त्याची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. त्यासाठी स्वच्छता राखणे खूप महत्त्वाचे आहे. आरोग्याचे तीन प्रकार सांगताना आपण आपल्या शरीराची काळजी घेणे, मानसिक आरोग्य जपणे, सामाजिक आरोग्य यांचे स्पष्टीकरण करतानाच सांगितले की माणूस हा सवयीचा गुलाम आहे. त्यामुळे चांगल्या सवयी लावा व आरोग्य सुंदर करा असा सल्ला डॉक्टरांनी मुलांना दिला. सुप्रिया आचवल यांनी आश्रमा ची सखोल माहिती देऊन सांगितले की येथे मुलांच्या शिक्षणाबरोबरच सर्वांगीण विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. स्वावलंबन, शिस्त, शारीरिक आरोग्य व खेळ आणि आधुनिक शैक्षणिक प्रगती याकडे लक्ष दिले जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आणि कौटुंबिक वातावरणातून आलेली ही मुले येथून दहावी पास होऊन जाताना समाजात सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभी राहावीत यासाठी प्रयत्न केले जातात.
या कार्यक्रमात चिंचवली केंद्रातून शालांत परीक्षेत प्रथम आलेले व परीक्षेत सारखी मार्क्स पडलेले विठ्ठल विष्णू पारधी व स्वप्निल महादेव वाक या विद्यार्थ्यांचा गुच्छ व आर्थिक मदत देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौ. मीराताई पाटील यांनी शालेय साहित्य, डॉ. रवींद्र गोसावी यांनी औषधे तर डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. जी. एस. नंदा, प्रकाश वामनराव पवार, शशिकांत देशपांडे, रवींद्र कांबळे, नितीन देशपांडे यांनी सक्रिय सहभाग घेऊन वस्तू व आर्थिक स्वरूपातील मदत उपलब्ध करुन देऊन उपक्रम अधिक प्रशंसनीय आणि अधोरेखित केला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष हांडे देशमुख यांनी नेटके केले. सौ. प्रिया आचवल यांनी आभार मानले तर विजयराव निंबाळकर, जयेश भावसार तसेच सिद्धी विनायक केअर सेंटर मधील सेवकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अपूर्व मेहनत घेतली.
------+----------------------
प्रेषक :
सुभाष हांडे देशमुख
नेरुळ
0 टिप्पण्या