१४४ वर्षांनंतर तीर्थक्षेत्र प्रयाग राज मधे ४५ दिवस महाकुंभ मेळा साकारला व शाही स्नान, मंगल स्नान आणि अमृत स्नानाने संपूर्ण भारत वर्ष पवित्र झाला.
त्याच महा कुंभमेळ्याची प्रतिकृती दिनांक २५ व २६ फेब्रुवारी रोजी जे एम एफ संस्थेच्या प्रांगणात साकारली गेली. ब्रह्मा रंगतालया मध्ये गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती या त्रिवेणी संगम नद्या निर्माण केल्या गेल्या. संस्थेचे संस्थापक डॉ राजकुमार कोल्हे, सचिव डॉ प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी स्वतः प्रयागराज कुंभमेळा येथे जाऊन त्रिवेणी संगमाचे जल तसेच सप्त नद्यांचे जल घेऊन आले , व या नद्यांच्या पाण्यानी त्रिवेणी संगम निर्माण केला.भगवान शंकराच्या जटा मधून गंगेचा प्रवाह सुरू ठेवला तर बाजूलाच ( बर्फानी बाबा ) बर्फाचे शिवलिंग तयार केले.
सकाळच्या सत्रामध्ये जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा तसेच वंदे मातरम् पदवी महाविद्यालय चे सर्व विद्यार्थी, पालक वर्ग, शिक्षक आणि मान्यवरांनी हजेरी लावून महा कुंभ मेळाचा आनंद घेतला.
सकाळी सूर्योदय होताच संस्थेचे संस्थापक डॉ राजकुमार कोल्हे, सचिव डॉ प्रेरणा कोल्हे , खजिनदार जान्हवी कोल्हे तसेच इतर पदाधिकारी, मान्यवर पाहुणे श्रीमती अल्का मुतालिक अध्यक्ष गणेश मंदिर संस्थान, श्री बालकृष्णजी पाटील महाराज व अनेक मान्यवर आणि सर्व विद्यार्थी शिक्षकांनी गंगेची आरती केली. तत्पूर्वी सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांनी भारतीय संस्कृतीप्रमाणे गंगा मातेची व यमुना मातेला साडी अर्पण करून ओटी भरली व नंतर आरती ला सुरुवात झाली. सर्व विद्यार्थी ऋषी मुनींच्या वेषात आले होते .तर काहीजण शंकराचा अवतार घेऊन आले होते त्यांच्या साठी रथाची सोय केली होती . मंगलमय शोभायात्रा काढण्यात आली ,त्यामधे लेझिम , ढोल ताशे वाजवत ' हर हर महादेव च्या गजरात सर्वजण तल्लीन झाले होते.सर्व मुलांनी गंगा नदीमध्ये मंगल स्नान केले .विद्यार्थ्यानी शाळेच्या प्रांगणात ' आनंद मेळ्याचे ' आयोजन केले होते, खाद्य पदार्थांची रेलचेल होती , सर्वांनी आस्वाद घेतला.
गायत्री परिवार, हरिद्वार येथून गायत्री परिवाराचे गुरुजी, गुरु भगिनी आणि त्यांचे शिष्य यांनी प्रांगणात ' महा गायत्री यज्ञ ' होम हवन केले.त्यानंतर मधुबन वातानुकुलीत दालनांत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये शंकराचे भावगीत, शिव तांडव स्तोत्र, नृत्य, सती नाटिका, सागर मंथन नाटक अशा विविध प्रकारचे कार्यक्रम शालेय विद्यार्थी व पदवी महाविद्यालय चे विद्यार्थांनी सादर केले तर शिशु विहार च्या मुलांनी साधू वेष धारण करून हातात डमरू घेऊन शंकराचे डमरू नृत्य सादर केले.
इस्कॉन चे कृष्ण भक्त यांचे सुरेल संगीतमय कीर्तन झाले ,ज्यामध्ये सर्व उपस्थित वर्ग तल्लीन होऊन भजन गाऊ लागले.मठ दर्शन घेऊन सर्वांनी महा प्रसादाचा लाभ घेतला.
दुपारच्या सत्रामध्ये दुपारी चार वाजता जन गण मन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय मधील सर्व विद्यार्थी, पालक वर्ग, शिक्षक आणि इतर मान्यवरांनी महा कुंभमेळ्याचा लाभ घेतला. संध्याकाळी सहा वाजता गंगेची महा आरती करण्यात आली व शोभायात्रा काढण्यात आली.रथांमध्ये बसून सर्व साधू, शंकर वेशात आलेल्या मुलांची मिरवणूक काढण्यात आली. ब्रह्माकुमारीज राजयोग यांचा कार्यक्रम झाला तर आनंद बाजार मध्ये सर्व विद्यार्थी पालकांनी खाद्य पदार्थांचा आनंद लुटला.संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले त्यांनतर स्वामी अयप्पा महापूजेचे आयोजन करण्यात आले, उपस्थित सर्वांनी भक्ती भावने पूजा केली. व त्यानंतर महा प्रसादाचा भोग घेतला.
दोन दिवशी साधारण तीन हजार लोकांनी प्रतिकृती महा कुंभ मेळा ला हजेरी लावून सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतला.
दैवी शक्तीचा हात पाठीशी असल्याशिवाय अशा धार्मिक गोष्टी घडत नाहीत,कर्ता करविता साक्षात परमेश्वर आहे आणि आम्ही निमित्त मात्र आहोत, केवळ डोक्यात कल्पना आली की आपल्याही डोंबिवली मध्ये , आपल्या शाळेत कुंभ मेळा करावा आणि तत्परतेने त्या कल्पनेला कलाटणी मिळाली आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने अकस्मात सर्व गोष्टी जुळून आल्या आणि त्या घडत गेल्या. व त्यातून च ही मोठी महा कुंभ मेळा ची प्रतिकृती अवतरली असे संस्थापक डॉ राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
इच्छा असून देखील सर्वजण प्रयाग राजला जाऊ शकत नाही, आणि असा हा दुर्मिळ योगायोग सर्वच भाविकांना प्राप्त व्हावा अशी कल्पना आम्ही प्रयाग राजमधे त्रिवेणी संगमावर असतानाच मनामध्ये आली. आपण काही करू शकतो का हे विचार करत असतानाच साक्षात गंगा, यमुना ,सरस्वती ने आमच्या मस्तकावर आशीर्वादाचा हात ठेवला असावा आणि डोंबिवलीत आल्यावर अचानक सर्व गोष्टी जुळून आल्या , हा विलक्षण योगायोग आहे , सर्व भाविकाना गंगेत स्नान करता यावे या हेतूने इथे प्रतिकृती महा कुंभ मेळा चे आयोजन केले , असे सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांनी सांगितले.
प्रतिकृती महा कुंभ मेळा उभारण्याचे श्रेय नरेश पिसाट, अवधूत देसाई, मोहीत, व त्यांचे सहकारी यांचे आहे तर सर्व शिक्षकांनी देखील भक्ती भावाने सहकार्य केले.सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत हजारो भाविकांची आवक जावक होती.महाशिवरात्री दिवशी सकाळी पुन्हा गंगा आरती करून शंकराची मनोभावे पूजा अभिषेक करून महा कुंभ मेळा चे उत्तर पूजन केले.
न भूतो न भविष्यती अशा या महाकुंभ मेळा मुळे सकारात्मक लहरी सर्वत्र पसरल्या व एक नवीन ऊर्जा घेऊन भाविक धन्य झाले व सर्वांनी संस्थेचे आभार मानून भरभरून आशीर्वाद दिले.


.jpeg)
.jpeg)


0 टिप्पण्या