(दि. ३ आॅगस्ट२०२३ रोजी. निसर्ग व रानकवी ना. धों. महानोरांनी आपली इहलोकीची यात्रा संपवून वैकुंठाची वाट धरली. त्यांना हा शेवटचा निरोप... )
घे निरोप शेवटचा...
रानकवी नामदेवा, म्या पामरे काय तुझे गीत गावे
तू मातीत रुजविली कविता, ते गुपित तुजला ठावे ||१||
तू पाहता नभाकडे तुज साठी जलद ओथंबून येती
त्वा गाळल्या घामातून जोंधळ्याला लगडती मोती ||२||
पळसखेडा शिवारी, तू फळांच्या उभारल्या बागा
हाडाचा तू तर शेतकरी,कष्टाचा परी न केला त्रागा ||३||
वृक्ष-लता, गुरे-पाखरे सारे, तू मानलेस सगे-सोयरे
तुझ्या अंगणात दाणा-पाणी, राखिली सदा सोय रे ||४||
तू लिहिले मनातले-जनातले,केली न कुणाची पर्वा
केली न मनाशी प्रतारणा, तू मनाचा कवी सर्वेसर्वा ||५||
अजंठा पाषाणावर,तू कोरली कवितेची नवी लेणी
तू जपली लोकसंस्कृती, लोकरंजनाची दिली देणी ||६||
पाहून स्त्री-जीवनातील वेणा,तू प्रार्थिलेस दयाघना
अत्याचाराचे घाव लागले जिव्हारी,जागली करुणा ||७||
तव शब्दाशब्दांतून दरवळतो मातीचा कोवळा गंध
त्वा केलीस अत्तर पेरणी,दरवळला त्यातूनि सुगंध ||८||
तुझे बोलणे- गाणे, ऋग्वेदाच्या होत्या सहज ऋचा
कवितेतून बोधविले तू जना,हाचि धर्म महाकवीचा ||९||
अवचित सोडुनि गेलास, अंधारले सारे काव्याकाश
परि तव कविता-गीतातून लाभेल जगा, नव प्रकाश ||१०||
जा मुक्त पाखरा,कर मुक्त विहार वैकुंठाच्या दरबारी
घे शेवटचा निरोप अमुचा,परी ये परतून याच भूवरी ||११||
© प्रा. डॉ.राम नेमाडे.


0 टिप्पण्या