एकीकडे राज्यात पक्ष अस्तित्वाच्या प्रश्नासाठी उद्धव ठाकरेंचा कोर्टात लढा, तर दुसरीकडे मनसे राज्यात ॲक्शन मोडमध्ये सज्ज..

 



प्रतिनिधी: अवधुत सावंत


  राज्यातील सत्तासंघर्षाची ठिणगी ही शिवसेना आमदारांच्या बंडाने पडली व त्याने महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले. शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर सत्तेची समीकरणे नक्कीच बदलली, सोबतच काही पक्षांच्या अस्तित्वाचाच प्रश्न हल्ली नेमका निर्माण झाला आहे. आज आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे, सोबतच शिवसेना नेमकी कुणाची या मुद्द्यावर देखील सुनावणी दरम्यान प्रकाश टाकण्यात येणार आहे.


  एकप्रकारे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून शिंदे गटाला आमदार, खासदार, नगरसेवक इत्यादींचे मोठ्या प्रमाणात समर्थन असल्याने न्यायालयाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिल्यास शिवसेना प्रमुखपद देखील उद्धव ठाकरेंना गमवावे लागू शकते. याशिवाय संसद भवनातील शिवसेना भावनावर शिंदे गटाचा अधिकार यामुळे स्थापित होईल. दुसरीकडे मनसे पक्षाचा प्रभाव येत्या महापालिका निवडणुकीत कसा असेल, यावर देखील मनसेचे भवितव्य अवलंबून असणार आहे.


  आज पक्षबांधणी व येत्या महापालिका निवडणुकीबाबत चर्चेकरिता पक्ष नेते व कार्यकर्त्यांसोबत पक्षाध्यक्ष राज ठाकरे आढावा बैठक मुंबईत विविध शाखेत घेत आहे. त्यामुळे सध्याचे राजकीय वारे बघता मनसेकरिता सुद्धा अस्तित्वाची लढाई निर्माण झाली आहे. दोन्ही पक्षाचे बळ राज्यापुरते मर्यादित आहे परंतु शिंदे गटासोबत भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षाची साथ असल्याने सध्या एकनाथ शिंदे यांचे पारडे जड आहे. परंतु खरी लढाई उद्धव ठाकरे - महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट - भाजप अशी असल्याने आज होणारा सर्वोच्च न्यायालयातील निकाल पुढील घडामोडी स्पष्ट करेल, हे नक्की.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या