सुकी नदी पात्रात अडकलेल्या ९ पर्यटकांना वाचवण्यात जळगाव जिल्हा प्रशासनास यश..



प्रतिनिधी: अवधुत सावंत


  रावेर तालुक्यातील सुकी नदीपात्रात अडकलेल्या नऊ पर्यटकांना चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात जळगाव जिल्हा  प्रशासनास यश आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सुखी (गारबर्डी) धरणाचा वेस्ट वेअर ओसंडून वाहत असून या जलप्रवाहाच्या विळख्यात ९ पर्यटक अडकल्याची माहिती सायंकाळी ६.३० वाजता स्थानिकांनी प्रशासनाला दिली. हे नऊ पर्यटक नदीच्या मधोमध उभे असून पाण्याचा वेढा त्यांच्या दोन्ही बाजूने पडला आहे. तसेच पाण्याचा प्रवाह वाढतच असल्याने हे सर्व जण वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. याबाबतची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. बेहरे, सावदा येथील उपविभागीय अभियंता यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला देऊन बचाव कार्य तातडीने उपलब्ध करून देण्याची विनंती केली. 


  याबाबतची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना मिळताच त्यांनी फैजपूर चे प्रांत अधिकारी कैलास कडलग आणि रावेरच्या तहसिलदार उषाराणी देवगुणे यांना बचाव साहित्यासह घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर सतत सुरू असलेला पाऊस तसेच नदीपात्रात वाढत जाणारे पाणी ही बाब लक्षात घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची मदत मिळण्यासाठी मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षास संपर्क साधण्यात आला. त्यानुसार धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडीही घटनास्थळाकडे रवाना झाली.


  प्रांत अधिकारी कडलग आणि तहसिलदार श्रीमती देवगुणे यांनी स्थानिक नागरिक तसेच पोहणारे १. इम्रान शहा रतन शहा रा.पाल

२. संतोष दरबार राठोड रा.पाल 

३. रतन भंगी पावरा रा.गारखेडा ४. तारासिंग रेवलसिंग पावरा रा.गारबर्डी

५. सिद्धार्थ गुलजार भिल यांच्या मदतीने मुक्ताईनगर येथील या नऊ पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले. यासाठी त्यांना स्थानिक आमदार शिरीष चौधरी, रावेर तहसील कार्यालय, सावदा पोलीस स्टेशन, प्रांत कार्यालय फैजपूर, वन्यजीव अधिकारी व कर्मचारी आदीचे सहकार्य लाभले.


सुकी नदी पात्रात अडकलेल्या व सुटका झालेल्या व्यक्ती

१. अतुल प्रकाश कोळी (२० वर्षे)

२. विष्णू दिलीप कोलते (१७ वर्षे)

३. आकाश रमेश धांडे (२५ वर्षे)

४. जितेंद्र शत्रुघ्न कूंडक (३० वर्षे

५. मुकेश श्रीराम धांडे (१९ वर्षे

६. मनोज रमेश सोनावणे (२८वर्षे)

७. लखन प्रकाश सोनावणे (२५ वर्षे)

८. पियूष मिलिंद भालेराव (२२ वर्षे)

९. गणेशसिंग पोपट मोरे (२८ वर्षे) सर्व रा. मुक्ताईनगर या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.


  जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून नदीपात्रात पाण्याची अचानक वाढ होत असल्याने नागरिकांनी नदीपात्रात तसेच धरण परिसरात जावू नये असा इशारा देत परिसरातील सर्व नागरिकांना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या