कोरोना विधवांच्या विवाहास शासनाने प्रोस्थाहन देणे गरजेचे - हेरंब कुलकर्णी
देवळाली प्रवरा - दि. ११ डिसेंबर
कोरोना विधवांच्या विवाहास शासनाने प्रोस्थाहन देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी केले.
अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील किशोर राजेंद्र ढूस या तरुणाने नऊ महिन्याचे बाळ असलेल्या विधवा महिलेशी लग्न करून समाजासमोर एक आदर्श घालून दिला आहे. त्या निमित्ताने किशोर व त्याची पत्नी यांचा त्यांचे देवळाली प्रवरा येथील निवासस्थानी समितीच्या वतीने स्नेह सत्कार करताना हेरंब कुलकर्णी बोलत होते.
या प्रसंगी महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक श्री व सौ हेरंब कुलकर्णी यांचेसह समितीचे जिल्हा संघटक अशोक कुटे, मानिषा कोकाटे, देवळाली हेल्प टीम चे अध्यक्ष दत्ता कडू पाटील, पुनर्वसन समितीचे श्रीरामपूर तालुका समन्वयक पत्रकार मिलिंद साळवे, पत्रकार शिवाजी घाडगे, पत्रकार गोविंद साळुंके, बाळासाहेब जपे, आधार फौंडेशनचे चंद्रकांत कोकाटे, कृषि सहायक गडधे साहेब, राहुरी तालुका समन्वयक आप्पासाहेब ढुस, प्रशांत कराळे, देवळाली हेल्प टीमचे सदस्य, गिताराम बर्डे, ऋषी संसारे, गणेश रिंगे, विजय कुमावत, किशोर ढुस यांचे वडील श्री व सौ राजेंद्र दगडू ढुस, आजोबा श्री व सौ दगडू त्रिंबक ढुस, किशोर चे बंधू किरण ढुस, रवी मोरे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना हेरंब कुलकर्णी म्हणाले की, या दाम्पत्याने परंपरेला झुगारून जीवनाची नवी सुरुवात करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. तो अत्यंत स्तुत्य असून कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती लवकरच राज्यस्तरावर विधवा विवाहाची चळवळ सुरु करीत आहे. अहमदनगर जिल्ह्याचे समन्वयक अशोक कुटे यांनी यात पुढाकार घेऊन विवाह नोंदणीसाठी वेबसाइटही तयार केली आहे.
या चळवळीत होणारा देवळाली प्रवरा येथील किशोर च्या रूपाने हा पहिला विवाह असल्याने ही बाब इतरांना नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकल महिला पुनर्वसन समितीने आज या दाम्पत्याला भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.
शासनाने कोरोना एकल भगिनींसाठी संजय गांधी निराधार योजना सारख्या योजना लागू करून केवळ हा प्रश्न सुटणार नाही. तर, ज्या कोरोना विधवा झालेल्या तरुण भगिनी आहेत त्यांचे पुनर्विवाह लावून त्यांना कायमचा आधार मिळवून देण्यासाठी अश्या जोडप्यांना विवाह करण्यासाठी आंतरजातीय विवाहासाठी शासनाच्या असलेल्या तरतुदीप्रमाणे प्रोस्थाहन अनुदान देणेची तरतूद करण्याची आज खऱ्या अर्थाने गरज निर्माण झाली आहे. व शासनाने ती तरतूद करावी अशी विनंती समितीच्या वतीने आम्ही शासनाकडे करणार असल्याचे यावेळी हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी सर्वांचे आभार मानले.

0 टिप्पण्या