बकुळ कट्टाच्या माध्यमातून वारी विषयावर कवी संमेलन
प्रतिनिधी (नवी मुंबई) सुभाष हांडे देशमुख:
भूमिपुत्र सामाजिक प्रतिष्ठान नवी मुंबई या सेवाभावी संस्थेच्या विद्यमाने करावे गावातील महानगरपालिकेच्या उद्यानातील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात बकुळबाग - कवी कट्टा अंतर्गत कवी संमेलनाचे दिनांक १५ जुलै २०२३ रोजी आयोजन करण्यात आले. वारी या विषयावर पार पडलेल्या या काव्यसंमेलनास रवींद्र महाडीक (अध्यक्ष एस आर डब्ल्यू ) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्रा. अविनाश पाटील यांनी भूषविले.
करावे, नेरुळ, सीवूड तसेच आसपासच्या परिसरातील कवी, कवयित्री यांनी या संमेलनात उत्स्फूर्तपणे मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. आजचा काव्यसंमेलनासाठीचा विषय "वारी" हा दिला होता. ज्याला सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला.
कवयित्री सुचित्रा कुंचमवार यांनी यावर्षी पुणे ते सासवड वारीचे प्रत्यक्ष सहभागी होऊन घेतलेले अनुभव कथन केले. तसेच वारी म्हणजे काय आणि आपल्या जीवनातील तिचे महत्त्व, याचे निरुपण आपल्या शब्दांत व्यक्त केले.
काव्यसंमेलनात घनश्याम परकाळे, गजआनन म्हात्रे, सुतार सर, श्री. धोंड, अनिल मूलंगरे, नवदुर्गा पवार, तेजस्विनी महाडिक, विमलताई, सुचित्रा कुंचमवार, डॉ.पूनम पाकिजा, अविनाश पाटील यांनी आपल्या कविता, अभंग सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली व सर्व वातावरण विठुच्या गजराने भारावून टाकले.
ज्ञानदीप शाळेचे मुख्याध्यापक श्री. तांडेल सर यांनी त्यांच्या मुलांना वारी बघता यावी, वारी काय आहे हा अनुभव घेण्यासाठी प्रत्यक्षात वारीत घेऊन गेलो याची आठवण सांगितली.
घनश्याम परकाळे यांनी फोटोग्राफी करण्यासाठी वारीत गेलो पण माऊलींनी ती कशाप्रकारे पूर्ण करून घेतली याचे अनुभव कथन केले. तसेच वारीत पांडुरंग भेटतो याचे अनेक दाखले कसे मिळाले याचे वर्णन केले.
भूमिपुत्र सामाजिक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष कवी गजआनन म्हात्रे यांनी ५ ऑगस्टला खाडीवरची माडी चर्चासत्रात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. तसेच बकुळ कट्टा मासिक काव्यसंमेलनास चांगला प्रतिसाद मिळत आहे हे नमूद केले.
काव्यसंमेलनाचे निवेदन घनश्याम परकाळे यांनी अध्यात्मिक दाखले देत, वारीचे अनुभव सांगत उत्कृष्ट शैलीत करून उपस्थितांची मने जिंकली.
गजआनन म्हात्रे यांनी सर्वांचे यथोचित आभार मानले.
पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
-----------------------------
0 टिप्पण्या