भाजपचा शिवसेनेला टोला
डोंबिवली ( शंकर जाधव ) दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून कोपर उड्डाण पुलाचे लोकार्पण मंगळवारी होणार आहे. डोंबिवलीकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या उड्डाणपुलाच्या कामासाठी श्रेय घेऊन नयेत. स्थानिक नागरिकांनी तसेच सर्वपक्षीय नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी यासाठी कष्ट घेतले आहेत. गणेशोत्सवपुर्वी उड्डाणपुल सुरू झाला नसता तर डोंबिवलीकरांनी उग्र आंदोलन केले असते. प्रशासनाकडून जरी पुलाचे लोकार्पण होणार असले तरी अद्याप पुलाचे सर्व्हिस रोड मात्र पालिकेच्या कागदावरच दिसतात. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोपर पुलाचे लोकापर्ण केले जात असल्याची टीका माजी विरोधीपक्ष नेता तथा स्थानिक माजी नगरसेवक मंदार हळबे यांनी शिवसेनेवर केली आहे.
कोपर उड्डाणपूल वाहतुकीस मोकळा होणार असला तरी यावर राजकारण करण्यास शहरातील राजकीय नेत्यांनी बाह्या सरसावल्याचे दिसून येत आहे. रस्त्यातील खड्ड्यांमुळे मनसेने दोन दिवसांपूर्वीच भरपावसात आंदोलन करून प्रशासनाला धारेवर धरले. पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी शिवसेनेची तळी उचलून धरतात असे आरोप मनसे करत आहे. राज्यात शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून बसणारे काँग्रेसचे पुढारी असले तरी डोंबिवली शहरातील काँग्रेस कार्यकर्ते पालिका प्रशासनाच्या नावाने बोटे मोडीत आहेत. काँग्रेस नेते तथा माजी नगरसेवक रवी पाटील यांनी कोपर उड्डाणपुलाच्या कामाच्या बाबतीत नाराजी दर्शविली असून उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडाचे काम अपूर्ण का असा सवाल केला आहे. सर्व्हिस रोडवरील बाधित नागरिकांकडून त्या कामाला "स्टे" आणण्यासाठी प्रशासनाने काम अर्धवट टाकले आहे का अशी विचारणा केली आहे. तर मनसेने पुलाचे लोकार्पण करतांना काळे झेंडे दाखवून पालिकेच्या ढिसाळ कामाबाबत निषेध नोंदविण्याचा बेत आखला आहे. परंतु या राजकीय गोष्टींकडे कानाडोळा करीत डोंबिवलीकरांनी पुलाचे लोकार्पण होणात असल्याने समाधान मानले आहेत. कोपर उड्डाणपूल झाल्यामुळे आता पूर्व-पश्चिम प्रवास सुखकर होणार असून वेळेची बचत होणार आहे. पूर्व-पश्चिम नागरिकांसाठी आता दोन उड्डाणपूल वाहतुकीसाठी मिळणार असल्याने वाहतूक कोंडी होणार नाही. आता डोंबिवली शहरातुन बाहेर पडण्यास कमी वेळ खर्ची होईल आणि इच्छित स्थळी लवकर पोहचता येणार असल्याने डोंबिवलीकर आनंदात असल्याचे दिसून येत आहे.


0 टिप्पण्या